सैन्य दलाचा अभिमान वाटतो!   

सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून कारवाईचे कौतुक

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या कारवाईचे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींपासून ते अखिलेश यादव यासारख्या सर्वच नेत्यांनी कौतुक केले आहे. योगगुरु बाबा रामदेव यांनी मागणी केली की, व्याप्त काश्मीर परत घ्यावे आणि लाहोरमध्ये तिरंगा फडकवावा. भारताच्या आत्म्यावर हल्ला करणार्‍यांना कठोर शिक्षा होईल, असे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.
 
भारताने दहशतवादाला योग्य आणि चोख प्रत्युत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. कृती न्याय्य आणि धाडसी आहे., असे सांगताना त्यांनी सुंदरकांडातील श्लोक  सादर केला. त्यात हनुमानजी जिन्ह मोही मारा तिन मैं मारे म्हणत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या देखरेखीखाली कारवाई करण्यात आली. त्यामुळे देशाच्या सुरक्षा धोरणाची ताकद जगाला दिसली आहे, असेही ते म्हणाले.
 
क्रूरपणे निरपराध नागरिकांची हत्या करणार्‍या दहशतवाद्यांना भारताने धडा शिकविला आहे. कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला मोदी सरकार असेच उत्तर देणार आहे. दहशतवाद मुळापासून उखडून टाकला जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 
 
दहशतवादमुक्त जग काळाची गरज आहे., अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर यांनी दिली. आपल्या संरक्षण दलांचा अभिमान वाटतो, जय हिंद ! अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दिली. पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने धाडसी आणि निर्णायक कारवाई केली. त्याचा पक्षाला अभिमान आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. आज मला माझ्या देशाचा फार अभिमान वाटतो, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी सांगितले.
 
अशोक गेहलोत म्हणाले की, पाकिस्तानी दहशतवादी तळ नष्ट करून दहशतवाद्यांना मोठा धक्का सैन्याने दिला. काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण भारत या कृतीचे स्वागत करतो. आम्ही भारतीय लष्कर आणि भारत सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.पीसीसीचे प्रमुख गोविंद सिंग म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद एक समस्या आहे. पुलवामा आणि पहलगाममध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भारतीयांना लक्ष्य केले. तेव्हापासून. प्रत्येक पक्ष आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. दहशतवाद संपवण्यासाठी काम झाले पाहिजे. संपूर्ण देशाला सैन्याचा अभिमान आहे.
 
आम्ही शांततापूणर्ं जीवन जगत होतो. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्याला तडा दिला. आम्ही काही सुरू केले नाही. आम्हाला युद्ध नको आहे,  आम्ही परिस्थिती सुधारावी, अशी अपेक्षा धरत होतो. आता पाकिस्तानने बंदुका खाली घ्यव्यात, अशी प्रतिक्रिया उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. ऑपरेशन सिंदूरचे मी स्वागत करतो. पुन्हा पहलगाम होणार नाही, असा धडा दहशतवाद्यांना मिळावा. पाकिस्तानातील प्रत्येक दहशतवादी तळ नष्ट झाले पाहिजेत. जयहिंद !  अशा शब्दांत एमआएमचे खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. 
 

Related Articles